मांजरपाडा २ प्रवाह वळण योजनेस प्रशासकीय मान्यता मिळणेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्री दादाजी भुसे यांचे पत्र ….!

लाल दिवा -नाशिक,दि.१२ : गिरणा खोरे मुळात तुटीचे खोरे आहे. कसमादेसह खानदेशमधील नागरिकांसाठी मांजरपाडा प्रकल्प वरदान ठरणारा आहे. गेल्या चार दशकांपासून यासंदर्भात मागणी होत आहे. मांजरपाडा-१ ला शासनाने परवानगी देऊन प्रत्यक्ष कामही पूर्ण झाले आहे. त्याचवेळेस मांजरपाडा-२ प्रकल्प कार्यान्वित होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची भावना लक्षात घेवून सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी पुढाकार घेतला असून मांजर पाडा दोन संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार केला आहे.

मांजर पाडा -२ प्रकल्पाचा DPR तयार झाला असून या प्रकल्पाचे राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे छाननीचे काम अंतिम टप्प्यात आहे. राज्यातील एकनाथ शिंदे व भाजप सरकारने उर्ध्व गोदावरी प्रकल्पासाठी दीड हजार कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. ही समाधानाची बाब आहे त्याचवेळी मांजरपाडा-२ कडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याची आग्रही भूमिका मंत्री भुसे यांनी घेतली आहे. 

 

गिरणा खोऱ्याला लाभदायी ठरणारा तसेच कसमादेवासीयांना त्याची मोठी प्रतिक्षा आहे. मांजरपाडा-२ कार्यान्वित झाल्यास कसमादेसह खानदेशमधील शेतीला त्याचा फायदा होईल. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील शेकडो पाणीपुरवठा योजनांनाही फायदा होऊ शकेल. मंत्री दादा भुसे यांनी या प्रश्‍नाला सर्वाधिक प्राधान्य देत तो सोडविण्यासाठी आग्रही भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वापराविना अरबी समुद्रास (गुजरात) जाऊन मिळते. हे अतिरिक्त पाणी पूर्वेकडील तुटीच्या गिरणा उपखोऱ्यात वळविणे हा मांजरपाडा-२ योजनेचा मुख्य उद्देश असून केम डोंगरात उगम पावणाऱ्या नार – पार नदीवर मांजरपाडा-२ योजना साकारण्याचे प्रस्तावित आहे.

 

शासनाच्या धोरणानुसार पश्चिम वाहिनीद्वार समुद्राला जाऊन मिळणारे पाणी आडवून अतितूटीच्या गिरणा खोऱ्यात (तापी खोरे) पाणी वळवून सिंचना ४९१५ हेक्टर) क्षेत्राचे व टंचाईग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याचे स्थिरीकरण करणे आवश्यक आहे. एकात्मिक जल आराखडयानुसार १७.९८ द.ल.घ.मी. (६३४.९६ द.ल.घ.फु.) इतकी पाणी साठयाची तरतूद ठेवण्यात आली असून या प्रकल्पास पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त आहे. मांजरपाडा -२ (गुगुळ-पार-तापी) गिरणा प्रकल्प अहवाल हा तापी पाटबंधारे प्रकल्प महामंडळ, जळगांव यांचे पत्र दिनांक ०७/०७/२०२१ नुसार (ता.प्रा.प्र. म प्रशा२/२९२ / २०२१) सादर करण्यात आलेला आहे.

 

सदर प्रकल्पामुळे स्थानिक रहिवाशांचा पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी व रहिवासी हा प्रकल्प होणेबाबत आग्रही असून हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागणेसाठी शासनाच्या धोरणानुसार संबंधितांना आदेश देण्याची मागणी मंत्री भुसे यांनी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!