विद्यार्थिनी वसतिगृहांच्या सुरक्षेसाठी कडक नियम पाळा – चंद्रकांत पाटील…!
लाल दिवा-मुंबई, दि. २९: विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी वसतिगृहातील सर्व सुरक्षा नियम काटेकोरपणे पाळले जावेत आणि २४ तास सुरक्षा व्यवस्था उपलब्ध राहील याची खातरजमा करावी, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत.
उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत मुलींच्या वसतिगृहातील सुरक्षेसंदर्भात मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, सहसंचालक प्रकाश बच्छाव आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, “विद्यार्थिनी वसतिगृहातील सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असून, पालकांप्रमाणेच संबंधित अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने लक्ष देणे गरजेचे आहे. वसतिगृहातील सुरक्षेची पाहणी आणि आढावा नियमितपणे घेतला पाहिजे. तसेच जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांवर वसतिगृहांचे पालकत्व सोपवता येईल का याचा विचार करावा लागेल.”
“वसतिगृहांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करणे आणि विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे. सुरक्षा पुरविण्यात कोणतीही दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असा इशाराही मंत्री श्री. पाटील यांनी दिला.