माऊली पुन्हा सेवेत हजर होईल; पालकमंत्री भुसे यांनी व्यक्त केला विश्वास…….अंत्यविधीचे अविरतपणे कार्य करणाऱ्या सुनीताताई पाटील अंथरुणाला खिळून….. पालकमंत्र्यांची रात्री उशिरा निवस्थानी धाव… !
लाल दिवा-नाशिक,ता.१ : नाशिक शहराचे वैभव असलेल्या रणरागिणी सूनिताताई पाटील या आजाराने ग्रस्त असून अंथरुणाला खिळून पडल्याची माहिती नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांना मिळताच त्यांनी आज रात्री त्यांच्या निवास स्थानी भेट घेत तबियतीची विचारपूस केली. पंचवटी अमरधाममध्ये अंत्यविधीचे अविरतपणे कार्य सुरू ठेवणाऱ्या सुनीताताई पाटील गेल्या अडीच महिन्यांपासून पक्षवात आजाराशी लढा देत आहेत. या महिलेने कोरोनाकाळात आणि त्यापूर्वी अनेक वर्षांपासून निरपेक्ष वृत्तीने काम केले. ही रणरागिणी आजारी असल्याची माहिती मिळताच नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांनी आज रात्री उशिरा त्यांची भेट घेवून त्यांना सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले.
पालकमंत्री भुसे यांनी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अमरधाम येथे त्यांचे राहते घरी भेट देऊन मेंदू रोग तज्ञ डॉक्टर राहुल बाविस्कर यांच्याशी चर्चा करून त्यांच्यावर उपचार करण्याची विनंती केली. पाटील यांची परिस्थिती सामान्य असल्याने वेळेत उपचार घेता येत नसल्याची माहिती वर्तमानपत्रातून पालकमंत्री यांनी वाचली होती. पाटील यांची हलाखीची परिस्थिती असल्याने त्या अंथरुणावर पडून आहेत. या माउलीने कोरोना कार्यकाळात असंख्य मृतदेहाच्या कोणी जवळ येत नसताना विधिवत अंत्यसंस्कार केले. अनेक वर्षांपासून त्या हे अंत्यसंस्काराचे कार्य करत आल्या आहेत. कुठल्याही आजाराने माणूस गेला असेल तरी त्यांनी प्रामाणिकपणे त्याचा अंत्यसंस्काराचा विधी केला असल्याचे सर्वांना ज्ञात आहेत.
- पाटील यांच्या कार्याचा अनेक संस्था, शासन, सामाजिक कार्यकर्ते यांनी गौरव केला आहे. ‘माउलीला पुन्हा एकदा जनसेवेसाठी लवकर आजारमुक्त करा’, अशी सर्वच घटकांकडून प्रार्थना केली जात आहे. पालकमंत्री भुसे यांच्या भेटीमुळे या माऊलीच्या पुढील उपचाराची चिंता मिटली असून डॉ. बाविस्कर यांना उपचार करण्यासाठी विनंती केली आहे..