जाणून घ्या, अशी राहिलीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची प्रशासकीय कारकीर्द !

संदीप कर्णिक हे गेल्या १९ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. मुंबईमधील जन्म आणि शिक्षण. पहिल्या प्रयत्नातच आयपीएस परीक्षा उत्तीर्ण झाले. पोलिस दलात दाखल झाल्यानंतर राज्यातील विविध प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. पोलिस दलातील कामाचा ताण तणाव न घेता हसतमुख चेहऱ्याने प्रत्येकाचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. फिटनेसबाबत तर ते अत्यंत जागरूक आहेत. सध्या ते नाशिक शहर पोलिस दलात पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याविषयी थोडक्यात…

 

संदीप कर्णिक यांचा जन्म मुंबईतील. मुंबई शहरात लहानाचे मोठे झाले. शिक्षणही मुंबईतच झाले. वडील बँकेत नोकरीला. संदीप कर्णिक हे शिक्षणात लहानपणापासून हुशार असल्यामुळे अधिकारीपदापर्यंत झेप घेणार हे कुटुंबीयांना माहीत होते. कुटुंबीयांनी त्यांच्यावर कोणतेही दडपण न देता शिक्षणातील निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार दिला. कुटुंबामध्ये कोणीही पोलिस दलात नव्हते. पण संदीप कर्णिक यांना लहानपणापासून पोलिस दलाचे आकर्षण होते. त्यामुळे त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या प्रयत्नातच ते आयपीएस परीक्षा उत्तीर्ण झाले. वयाच्या २९व्या वर्षी पोलिस अधिकारी म्हणून ते पोलिस दलात रुजू झाले आहेत.

 

  • शिक्षण…

 

संदीप कर्णिक यांचे पहिलीपासून ते पदवीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून मुंबई येथे झाले. बीई (इलेक्ट्रॉनिक्स) पदवी घेतल्यानंतर एमबीए करण्याचा निर्णय घेतला. पुणे शहरात राहून त्यांनी एमबीए (मार्केटिंग) पूर्ण केले. हातामध्ये दोन पदव्या असताना त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. कारण, आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. अभ्यासामध्ये जरी हुशार असले तरी त्यांना आयपीएस अधिकारी होण्याचा आत्मविश्वास नव्हता. यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अधिक मेहनत घ्यावी लागणार, हे त्यांनी ओळखले आणि तयारीला लागले. दिवसभरामध्ये १६-१६ तास अभ्यास करून २००४ साली ते पहिल्या प्रयत्नातच आयपीएस अधिकारी झाले आणि स्वप्न पूर्ण केले. शिवाय, मास्टर्स इन पोलिस मॅनेजमेंटचा सुद्धा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

 

  • पोलिस दलातील कार्यकाळ...

 

  • १) पोलिस अधीक्षक, जालना

 

  • २) पोलिस अधीक्षक, नांदेड
  • 3) पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण
  • ४) पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे
  • ५) मुंबई : अ. पोलिस उपायुक्त परिमंडळ – २ मुंबई ब. पोलिस उपायुक्त विशेष शाखा मुंबई क. पोलिस उपायुक्त आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई ड) अपर पोलिस आयुक्त गुन्हे ई) अपर पोलिस आयुक्त, पश्चिम विभाग, मुंबई
  • ६) २०२२ मध्ये विशेष पोलिस महानिरीक्षक पदोन्नतीवर नेमणूक सहपोलिस आयुक्त पुणे शहर
  • ७) पोलिस आयुक्त, नाशिक शहर

 

  • पोलिस दलात दाखल…

 

आयपीएस पदाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते पोलिस दलात दाखल झाले. गेल्या १९ वर्षांमध्ये महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये त्यांनी पोलिस अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. पुणे ग्रामीण, जालना व नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. ठाणे जिल्ह्यात लाचलुचपत विभागाची जबाबदारी पार पाडली आहे. मुंबईत विशेष शाखेचे आणि DCP Zone-2, मुंबईत पश्चिम विभाग तसेच गुन्हे विभागाचे अतिरीक्त पोलिस आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी विविध विषय मार्गी लावले असून, सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. पुणे शहर पोलिस दलात सहपोलिस आयुक्त म्हणून मोठी जबाबदारी पार पाडली आहे. सध्या ते नाशिक शहरचे पोलिस आयुक्त म्हणून काम पाहात आहेत.

 

मुंबईमध्ये कार्यरत असताना कोरोना काळात नागरिकांच्या स्थलांतराची मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती. तब्बल साडेसहा लाख नागरिकांना त्यांच्या घरी पाठविण्याचे काम त्यांनी पेलले होते. संदीप कर्णिक यांनी पोलिस दलात उल्लेखनीय काम केले असून, 2020 मध्ये पोलिस महासंचालक पदांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

 

  • पोलिस दल आणि ताणतणाव...

 

पोलिस दल आणि पोलिस दलामध्ये अधिकारी पदावर कार्यरत असताना कामाचा ताणतणाव असतोच. पण, समोर आलेल्या व्यक्तींच्या शंकाचे निरसन करून न्याय मिळवून देण्याचे काम केल्यामुळे मोठे समाधान मिळत असते. शिवाय, पोलिस दलात सर्व जण एकत्र मिळून काम करत असल्यामुळे फारसा ताणतणाव राहत नाही. एकमेकांना समजावून घेऊन मदत करणे, हा महाराष्ट्राच्या मातीचा गुणच आहे. सर्वच घटक मदत करत असल्यामुळे ताणतणाव कुठल्या कुठे दूर निघून जातो हे कळतही नाही, असे संदीप कर्णिक सांगतात.

 

  • राजकीय हस्तक्षेप…

 

पोलिस दल, पोलिस अधिकारी म्हटल्यावर राजकीय हस्तक्षेप असतो, असे सर्वसामान्य नागरिकांचे मत झाले आहे आणि चर्चाही तशीच असते. खरंच, पोलिस दलामध्ये राजकीय हस्तक्षेप असतो का? याबाबत थेट संदीप कर्णिक यांना प्रश्न विचारल्यानतंर ते सांगतात की, ‘भारतामध्ये लोकशाही आहे. एक लोकसभा-विधिमंडळ, दुसरा न्यायपालिका, तिसरा प्रशासन आणि चौथा माध्यमे. हे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. नागरिकांनीच आपले प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींना

 

निवडून दिलेले असते. यामुळे नागरिक स्वाभाविकच आपले प्रश्न घेऊन राजकीय नेत्यांकडे जात असतात. यामुळे राजकीय नेतेसुद्धा नागरिकांचेच प्रश्न पोलिसांकडे घेऊन येत असतात. पण, दोन्ही बाजू ऐकून घेऊन त्या सोडवण्याचे काम पोलिस करत असतात. यामुळे राजकीय नेत्यांचा कामामध्ये हस्तक्षेप असतो, असे म्हणता येणार नाही. कारण, ते जनतेचे प्रश्न लोकप्रतिनिधी म्हणून मांडत असतात.’

 

  • कुटुंबाचे सहकार्य…

 

कुटुंबाला पोलिस दलाची पार्श्वभूमी नव्हती. पण, वडील बँकेत नोकरीला असल्यामुळे कामाचा ताण किती असतो, हे पहिल्यापासून पाहिले आहे. पहिल्यापासून कुटुंब पाठीशी उभे राहिल्यामुळे यश प्राप्त करता आले आहे. पोलिस दलात काम करत असताना कोणती वेळ कधी आणि कशी येईल, हे सांगता येत नाही. यामुळे नेहमीच सतर्क राहावे लागते. दुसरीकडे, आयपीएस अधिकारी अजित पारसनीस हे संदीप कर्णिक यांचे सासरे. अजित पारसनीस हे राज्याचे पोलिस महासंचालक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. वडिलांच्या कामाची पद्धत, धावपळ, पोलिस दलातील ताणतणाव लहानपणापासून पाहिला होता. आयपीएस अधिकारी संदीप कर्णिक यांच्याशी विवाह झाल्यानंतर पत्नी, सहचरिणी म्हणून त्यांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. थोडक्यात, कुटुंबीयांच्या सहकार्यामुळे अहोरात्र काम करताना अडचण येत नाही, यामागे कुटुंबीयाचे मोठे सहकार्य असते.

 

  • पत्नीची खंबीर साथ…

 

आयपीएस अधिकारी संदीप कर्णिक यांनी ठिकठिकाणी

 

मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. पोलिस दलातील कामगिरी पार पाडत असताना कुटुंबाचा पाठिंबा हा अतिशय महत्त्वाचा असतो. राज्याचे माजी पोलिस महासंचालक अजित पारसनीस यांच्या कन्येसोबत विवाह झाल्याचा संदीप कर्णिक यांना दुहेरी फायदा झाला असेच म्हणावे लागले. एक म्हणजे त्यांना पोलिस दलातील पार्श्वभूमी माहीत आहे. दुसरे म्हणजे पत्नी म्हणून त्या ताणतणावाच्या वेळी खंबीरपणे पाठीशी उभ्या राहत आहेत. पत्नीच्या सहकार्यामुळेच पोलिस दलात झोकून देऊन काम करता येत आहे. पत्नीची लाभलेली खंबीर साथ खूप मोलाची ठरत आहे. विवाह झाल्यापासून कुटुंबाची,

 

नातेवाइकांची जबाबदारी त्या पार पाडतात. पोलिस दलातील कामाच्या वेळा, ताणतणाव पत्नीला माहीत असल्यामुळे पोलिस दलात काम करणे शक्य झाले अन्यथा शक्य नव्हते, असे संदीप कर्णिक सांगतात.

 

  • आरोग्य…

 

संदीप कर्णिक हे फिटनेसबाबत अतिशय सतर्क आहेत.

 

कामासोबत आरोग्यही तेवढेच महत्त्वाचे आहे. आरोग्य जर व्यवस्थित नसेल तर त्याचा कामावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे आरोग्याची काळजी घेणे तेवढेच आवश्यक आहे. व्यायाम आणि संदीप कर्णिक हे एक समीकरण झाले आहे. पण, सूर्यनमस्काराशिवाय ते चालण्यालाही तेवढेच महत्त्व देतात. एखाद्या दिवशी वेळेअभावी व्यायाम करता आला नाही, तर दुसऱ्या दिवशी जास्त वेळ व्यायाम करण्याचा प्रयत्न करतात. आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आहारसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. कुटुंबीय आहाराबाबत अतिशय काळजी घेत असतात, असेही संदीप कर्णिक सांगतात.

 

  • उत्साह…

 

संदीप कर्णिक यांच्याकडे पाहिल्यानतंर त्यांचा उत्साह नेहमीच जाणवत असतो. सकाळी कार्यालयात आल्यानंतर असलेला

 

उत्साह संध्याकाळी घरी जातानाही अगदी तसाच असतो. शिवाय, कार्यालयात आलेल्या प्रत्येकाच्या प्रश्नाचे निरसन करण्याचा प्रयत्न ते करत असतात. पोलिस अधिकारी म्हटल्यावर दिवसभरात मोबाईलवर किती फोन आणि मेसेजेस येतात, याची गणतीच नाही. पण, प्रत्येकाचा फोन घेण्याबरोबरच मेसेजला उत्तर देण्याचे काम मी करत असतो, असेही संदीप कर्णिक सांगतात. आयुष्य हे साधे, सिंपल ठेवले तर अवघड असे काहीच नाही, असा मोलाचा सल्लाही ते देतात.

 

  • छंद…

 

फिरण्याची आवड, वाचन, ट्रेकिंग, पोहणे.

 

पोलिस दलातील सहकाऱ्यांना सल्ला….

 

मानसिक समाधान महत्त्वाचे – कुटुंब आणि नोकरी दोन्ही बाजू वेगवेगळ्या ठेवा

 

  • – आरोग्याकडे काळजी द्या

 

कामाशिवाय इतर गोष्टींसाठी वेळ द्या, छंद जोपासा

 

ताणतणाव घेऊ नका

 

गरजा कमी ठेवा

 

– छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद माना

 

  • स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सल्ला…

 

– प्रचंड मेहनत करा

 

– किमान

१६ तास अभ्यास करा

 

– मेहनत घेतली तर यश मिळणारच

 

– फुकट वेळ वाया घालवू नका…

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!